मुंबई;-राज्यात लवकरच 10 हजार पोलीस शिपायांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
यामुळे तरुणांना पोलीस दलात सेवेची संधी मिळणार असून याचा फायदा शहरी व ग्रामीण तरुणांना होणार असल्याचेही पवार यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत गृह विभागाकडून पोलिस शिपाई पदाच्या 8 हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात 2 हजार जागा वाढवून एकूण 10 हजार पोलिस शिपायांची भरतीप्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यात 10 हजार पोलिस शिपायांची भरती करण्याबरोबरच नागपूरच्या काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाची महिला बटालियन स्थापन करण्याचा निर्णयसुद्धा या बैठकीत झाला. दरम्यान, पोलिसांवरील ताण कमी होऊन कायदा सुव्यवस्था भक्कम होण्यास या भरतीमुळे मदत होईल असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.