देवेंद्र देविकार (गडचिरोली जिल्हा संपादक):- मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदावर शासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक न करता गावातील योग्य व्यक्तीची निवड केली जावी, असे आदेश राज्यपालांनी दिले आहेत.
या निर्णयाचा परिणाम म्हणून गावातील सर्वसामान्य नागरिकालाही आता ग्रामपंचायतीचा कारभार पार पाडण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत राज्यातील १२ हजार ६६८ ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे.
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर शासनाचा प्रतिनिधी बसवणार असल्याचं ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांनी घोषित केलं होतं. राज्याची दोन्ही सभागृहे बंद असल्यानं याबाबत आदेश निघू शकला नाही. मात्र आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रशासकपदावर गावातील योग्य व्यक्तीची नेमणूक करण्याचा आदेश नुकताच जाहीर केला आहे.
दरम्यान, गावातील राजकारणात अनेकजण संधी मिळावी यासाठी धडपडत असतात. गावातील आता अनेकांनी प्रशासक पदी वर्णी लागवी यासाठी नेत्यांना साकडं घालायला सुरूवात केली आहे. म्हणूनच सरपंच पदाच्या स्पर्धेसारखीच या प्रशासकाच्या स्पर्धेलाही बरीच रंगत येणार अशी चर्चा आता वर्तविली जात आहे