जिल्ह्यामध्ये व तालुक्यामध्ये प्रशासनामार्फत खूप मोठी मोहीम 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' राबवण्यात येत आहे. या अंतर्गत थर्मल स्क्रीनिंग, शरीरातील तापमान आक्सीमीटरने ऑक्सिजनचे तपासणीचे देखील प्रमाण मोजून प्रशासनाच्या अँड्रॉइड ॲप द्वारे ही माहिती थेट प्रशासनापर्यंत पोहोचवली जाणार आहे. तसेच संपूर्ण शहराला कोरोना पासून सुरक्षित राहण्याचे देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या 'विवेकानंद युवा मंडळाचा' सक्रिय सहभाग असणार आहे. उस्मानाबाद नगर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंडळाच्या आतापर्यंत कामाचा आढावा घेऊन या मोहिमेमध्ये मंडळाच्या अधिकाधिक कार्यकर्त्यांचा सहभाग राहणार असल्याचे सांगितले. यावेळी पालिकेकडून त्यांच्या २० टीम तयार करण्यात आले असून, यामध्ये नगर परिषद शिक्षक, आशा स्वयंसेविका कार्यकर्ती, शासकीय नर्स, नगरपरिषद कर्मचारी व विवेकानंद युवा मंडळाचे स्वयंसेवक असणार आहेत. घरोघरी भेटी देऊन ही पथके 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेबद्दल माहिती सांगून, त्याची आरोग्य तपासणी करणार आहेत. तरी शहरातील नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्याधिकारी प्रथमेश पवार साहेब यांनी आयोजित बैठकीमध्ये केले.
विवेकानंद युवा मंडळाचे स्वयंसेवक संपूर्ण जिल्हाभरा मधून विविध शासकीय कार्यालयामार्फत सामाजिक दायित्व म्हणून कार्य करणार आहेत. त्यामध्ये उस्मानाबाद, कळंब, नळदुर्ग, उमरगा, लोहारा, तुळजापूर या ठिकाणी विविध शासकीय कार्यालयांच्या माध्यमातून युवकांची एक मोठी फळी समाजासाठी धावून आली आहे, अशी माहिती मंडळाचे समन्वयक श्री.देशमुख यांनी दिली.
या बैठकीवेळी नगर परिषद शिक्षक, आशा कार्यकर्ती, नर्सेस, नगरपरिषद कर्मचारी, विवेकानंद युवा मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते बाळकृष्ण साळुंके, स्वप्नील देशमुख, महेंद्रप्रताप जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.