अहिल्यानगर, दि.२४ : जिल्ह्यात रेशीम उत्पादनवाढीस चालना देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या महारेशीम अभियान २०२६ अंतर्गत शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांच्या हस्ते रेशीम रथास हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) अनुपसिंह यादव, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे तसेच जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले, महारेशीम अभियान २०२६ अंतर्गत रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञान, सुधारित वाण, प्रशिक्षण तसेच विविध शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यात रेशीम लागवडीचे क्षेत्र वाढविणे, नवीन शेतकऱ्यांचा सहभाग निश्चित करणे व उत्पादनात वाढ साध्य करणे हा उद्देश आहे. रेशीम शेती हा पूरक व पर्यावरणपूरक शेतीव्यवसाय असून त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस हातभार लागणार आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून जिल्ह्याला रेशीम उत्पादनात आघाडीवर नेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे यांनी अभियानाची माहिती देत जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत मार्गदर्शन व नोंदणी सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले. तुती लागवड व रेशीम उत्पादनासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय, अहिल्यानगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात रेशीम माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. तसेच ‘आपले सरकार’ पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. रेशीम स्टॉलचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
#Ahilyanagar #MahaReshim #Sericulture #FarmerNews #DrPankajAshiya #Agriculture #RuralDevelopment #SilkFarming #अहिल्यानगर #रेशीम_शेती #महारेशीम_अभियान #शेतकरी #जिल्हाधिकारी #तुती_लागवड #शेती_पूरक_व्यवसाय #विकास