नांदेड - बौद्ध धम्मातील समता, न्याय, बंधुत्व आणि करुणेची मूल्येच समाजपरिवर्तनाची खरी ताकद आहेत. पंचशीलाचे आचरण केल्यास व्यक्ती शीलवान बनते आणि समाजात शांततेचे वातावरण निर्माण होते, असे प्रतिपादन भथंत पय्याबोधी थेरो यांनी केले.
भोकर तालुक्यातील नागपूर येथे आज चौदावी बौद्ध धम्म परिषद संपन्न झाली, धम्मदेशना देताना ते बोलत होते. यावेळी भंते संघपाल, भिक्खू श्रद्धानंद, भिक्खू शांतीदूत, भिक्खू संघदीप, भिक्खू सत्यशील, भिक्खू संघानंदा भिक्खू पय्यानाम आदींची मंचावर उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले, पंचशील हा प्रत्येक बौद्धांच्या जीवनाचा पाया बनला पाहिजे. बौद्ध तत्त्वज्ञानात समता, न्याय आणि बंधुत्वाची शिकवण दिली असून हीच मूल्ये आधुनिक लोकशाहीची आधारशिला आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना तयार करताना बौद्ध तत्त्वज्ञानातील मानवी मूल्यांचा स्वीकार केला. त्यामुळे समाजात खरी समानता प्रस्थापित करण्यासाठी बौद्ध विचारांचे अनुसरण आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून गाथा पठणाने धम्म परिषदेची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे, सिद्धार्थ पाटील, गंगाधर व्यवहारे, किशनराव कसबे, बी.एस.सरोदे, भगवान जमदाडे, माधव कसबे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात यश मार्केटिंगच्या वतीने भोजनदान करण्यात आले. यावेळी सिद्धार्थ पाटील, मिलिंद व्यवहारे व यश व्यवहारे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते. आयोजक सरपंच दत्ता व्यवहारे, नालंदा बुद्ध विहार समिती आणि सर्व महिला मंडळ तसेच ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.