नांदेड :- संशोधन प्रक्रियेत येणारे मानसिक दडपण आणि वेगवान जीवनशैलीमुळे वाढणारा ताण यावर प्रभावी उपाय सुचविण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या नवउन्मेषण व उपक्रम विभागाच्या वतीने दि.१७ मार्च रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास संशोधक, विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या व्याख्यानासाठी विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मानसोपचार तज्ज्ञ
डॉ. उमेश उषा आत्राम हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी ताणतणावाचे शास्त्रीय विश्लेषण करत त्याचा अर्थ, स्वरूप, मेंदूतील होणारे बदल तसेच शरीरातील विविध ग्रंथींची भूमिका यावर सविस्तर प्रकाश टाकला.
ताण निर्माण होण्याची कारणे, त्याचे शारीरिक व मानसिक परिणाम आणि त्याची लक्षणे ओळखण्याचे मार्ग याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. सामाजिक उदाहरणे आणि स्वतःच्या अनुभवातील यशोगाथा सांगत त्यांनी ताण व्यवस्थापनासाठी
उपयुक्त ठरणाऱ्या विविध प्रायोगिक तंत्रांची माहिती दिली.
व्याख्यानाच्या शेवटी उपस्थितांना ‘आनापान’ ध्यान साधनेचा प्रत्यक्ष सराव करून घेण्यात आला. या ध्यान प्रक्रियेमुळे सहभागींत सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून दैनंदिन जीवनात या साधनेचा अवलंब करण्याची प्रेरणा मिळाली.
हा उपक्रम कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन आणि कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नवउन्मेषण व उपक्रम विभागाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर यांनी डॉ. आत्राम यांचा परिचय करून दिला.
यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी आणि डॉ. जी. कृष्णा चैतन्य यांच्या हस्ते डॉ. आत्राम यांचा ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास डॉ. स्मिता नायर, डॉ. वसंत साळुंखे, बालाजी भासीकर आणि ओमकार मठपती यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जी. कृष्णा चैतन्य यांनी केले, तर डॉ. शिवाजी गायकवाड यांनी उपस्थितांचे व आयोजकांचे आभार मानले.