नांदेड - गावांचा सर्वांगीण विकास आणि शाश्वत स्वच्छता ही केवळ योजनांमधून नाही, तर लोकसहभागातूनच शक्य आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन लोकचळवळ उभी करावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले.
आज नांदेड येथे स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी मयूरकुमार आंदेलवाड, नरेगा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे, डाॅ प्रवीणकुमार घुले,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता शिंदे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार आदी उपस्थित होते.
स्वच्छता अभियानाला अधिक गती देण्यासाठी उजळणी प्रशिक्षण आवश्यक आहे. या प्रशिक्षणामुळे कर्मचारी प्रेरित होऊन प्रभावीपणे कामाला लागतील, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकात उपमुख्य कार्यकारी अधिकारी मयूरकुमार आंदेलवाड म्हणाले, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ हा अंतिम टप्प्यात असून या उपक्रमास एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची सर्व कामे पूर्ण करून गावे शाश्वत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या प्रशिक्षणात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड व क्षमता बांधणी तज्ञ चैतन्य तांदूळकर यांनी स्वच्छता कामांची माहिती सादर केली. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी स्वच्छता कर्मचारी लसीकरण व आरोग्य विषयावर मार्गदर्शन केले. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे यांनी जनावरांच्या मलमूत्र व वैरण व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले.
तसेच पाणी गुणवत्ता सल्लागार कपेंद्र देसाई यांनी जलप्रदूषण व स्वच्छता कर्मचाऱ्यांची भूमिका यावर सादरीकरण केले. अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील ग्रामपंचायत अधिकारी एकनाथ कदम यांनी गावातील स्वच्छता उपक्रमांचा अनुभव कथन केला.
या कार्यशाळेस तालुका स्तरावरील कनिष्ठ अभियंते, आरोग्य विस्तार अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील अधिकारी तज्ञ व सल्लागार तसेच तालुका गट समन्वयक व समूह समन्वयक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद व्यवहारे यांनी तर उपस्थितांचे आभार सुशील मानवतकर यांनी मानले.