सांगली प्रतिनिधी
सांगली हरिपूर रस्त्याचे अंदाजे 12 कोटी रुपये खर्चून कामाला सुरवात करण्यात आली असून हे काम अत्यंत सावकाशपणे आणि चुकीच्या पद्धतीने होत असल्यानेस्थानिक नागरिकांनी हे काम बंद पाडलंय. याठीकाणी निम्मा रस्ता उकरून ठेवलाय हा रस्ता उकरताना नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईप फुटल्या आहेत. शिवाय विद्युत खांब धोकादायक स्थितीत तसेच असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन आतापर्यंत अनेक अपघात या रस्त्यावर झाले आहेत .हे काम म्हणजे केवळ ठेकेदाराला पोसून त्यामधील टक्केवारीसाठीच होत असल्याचं दिसून येत आहे.ठेकेदाराकडून योग्य पद्धतीने काम होत नसल्याने नुकतेच हे काम इथल्या स्थानिक नागरिकांनी बंद पाडले आहे.
हे काम पावसाळ्याआधी लवकरात लवकर पूर्ण करावे. अन्यथा आणखी काही अपघात होण्याची शक्यता असून, एखाद्या प्रवाशाचा जीव जाऊ शकतो. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून सदर कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर ठोस कारवाई करून त्यास काळ्या यादीत टाकावे. अशी मागणी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्याकडे करणार असल्याची माहिती लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिली आहे.
दरम्यान हा रस्ता करत असताना संबंधित ठेकेदाराने इथल्या स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता हे काम सुरू केले आहे शिवाय रस्ता उकरताना त्यामध्ये पिण्याच्या पाईपलाईन फुटल्याने सदर पाईपलाईन दुरुस्त करून देण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असतानाही तसे न झाल्याने इथले स्थानिक नागरिक संतप्त आहेत .बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यानेही या रस्त्याबाबत नागरिकांना विश्वासात घेऊन कामास सुरुवात करणे आवश्यक असताना तसे झालेले दिसत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खातेही याला तेवढेच जबाबदार आहे .त्यामुळे सदर ठेकेदाराकडून नागरिकांच्या झालेल्या नुकसानीची दंडासह वसुली करण्यात यावी अशी मागणी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे . यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख (उद्धव ठाकरे गट ) गणेश लोखंडे उपस्थित होते