सांगली प्रतिनिधी,
जत तालुक्यातील गावांमधील आश्रम शाळेत मुख्याध्यापकाकडूनच सात मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या नराधम मुख्याध्यापकावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी. आणि त्याला सेवेतून बडतर्फ करावे संबंधित संस्थेच्या अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने सदर शाळेची मान्यता ही रद्द करावी अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्याकडे केली आहे.
सुट्टी दिवशी घरी गेल्यानंतर या मुलींनी झालेला प्रकार पालकांना सांगितल्यानंतर ही घटना समोर आली. त्यानंतर मुलींच्या पालकांनी मुख्याध्यापकास मारहाण केली परंतु आता या तक्रार दाखल करण्यात येऊ नये याबाबत पालकांच्यावर दबाव आणला जात असल्याचे दिसून येत असून पालकांना मानसिक आधार देऊन संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात तयार करावे
या विरोधात सखोल चौकशी होऊन संबंधित मुख्याध्यापकासह आणखी कोणी दोषी आहेत का? हे पाहून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई आणि यासाठी विशेष चौकशी समिती नेमावी अशी मागणीही लोकहित मंचच्या वतीने करण्यात आली आहे.