लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांना वेळेत सेवा द्या – आयुक्त डॉ. किरण जाधव

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 11/02/2026 6:15 PM

नांदेड :- नागरिकांना शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ विहित कालावधीत मिळावा यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू करण्यात आला आहे. या अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे नागरिकांना वेळेवर सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश छत्रपती संभाजीनगर येथील राज्य लोकसेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम-2015 अंतर्गत अधिसूचित सेवांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मोळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्री. गिरी तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.

आयुक्त डॉ. किरण जाधव म्हणाले, लोकसेवकांनी मानसिकता बदलून नागरिकांना घरबसल्या सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध करून द्याव्यात. विकसित भारत 2047 या उद्दिष्टाकडे वाटचाल करताना सर्वांनी कार्यक्षमतेने काम करण्याची गरज आहे. जिल्ह्याच्या मूल्यमापनातील क्रमवारी उंचावण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी जबाबदारीने पुढाकार घ्यावा. नागरिकांना सेवा देताना उत्कृष्ट प्रशासक म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची लोकप्रशासन संस्कृती अंगिकारावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या व भावी पिढीच्या हितासाठी अधिकाधिक सेवा ऑनलाईन करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले. प्रथम व द्वितीय अपीलीय अधिकाऱ्यांचे अधिकार व जबाबदाऱ्या तसेच विहित वेळेत काम पूर्ण न केल्यास लागू होणाऱ्या दंडात्मक तरतुदींची माहितीही त्यांनी दिली.

नांदेड जिल्ह्याची कामगिरी आगामी वर्षात अधिक उत्कृष्ट होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. चालू आर्थिक वर्षअखेर ३१ मार्चपर्यंत सर्व विभागांनी उद्दिष्टपूर्ती साध्य करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ऑनलाईन सेवांपैकी ‘ई-टपालवाला’ ही सेवा उल्लेखनीय असून ती सर्व कार्यालयांत प्रभावीपणे राबवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व महानगरपालिका प्रशासनाने अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत केलेल्या कार्यवाहीचे सादरीकरण केले.

प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी अजय शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. श्री. कर्डिले यांनी मागील वर्षभरात जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या उपक्रमांची माहिती देत ३१ मार्चपर्यंत सर्व कामे प्रगतीपथावर पूर्ण करण्यात येतील, असा विश्वास व्यक्त केला.

बैठकीस विविध विभागांचे विभागप्रमुख तसेच प्रथम व द्वितीय अपीलीय अधिकारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या