नांदेड :- इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी आज धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय या परीक्षा केंद्राला भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला.
भेटीदरम्यान त्यांनी परीक्षा केंद्रावरील प्रश्नपत्रिका सुरक्षित साठवणूक व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, परीक्षा हॉलमधील शिस्त, तसेच पर्यवेक्षकांची उपस्थिती यांची पाहणी केली. परीक्षा सुरळीत, पारदर्शक व कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी केंद्रावर करण्यात आलेल्या नियोजनाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, प्रकाश व्यवस्था तसेच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी पाहिले. केंद्रप्रमुख व शिक्षकांनी जबाबदारीने व नियोजनबद्ध पद्धतीने परीक्षा व्यवस्थापन केल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी त्यांचे कौतुक केले.
जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांनी याच पद्धतीने काटेकोरपणे नियमांचे पालन करून परीक्षा पार पाडाव्यात, तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराला बळी न पडता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.