नांदेड : गुढीपाडव्याच्या पावन मुहूर्तावर समाजसेवेची परंपरा जपत धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या वतीने ‘लोकनेते गोपीनाथराव मुंडे पाणपोई’ या उपक्रमाचा २५ वा वर्ष सुरू करण्यात आला. गुरुवारी भाजपा महानगराध्यक्ष अमर राजूरकर यांच्या हस्ते या पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान मोर्चाचे राम अय्यर होते, तर भाजपा उपाध्यक्ष बागडया यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोप करताना राम अय्यर म्हणाले की, “निष्ठावान कार्यकर्ते असूनही स्वीकृत सदस्य पद न मिळाल्यानंतरही ॲड. दिलीप ठाकूर यांनी नाराजी न दाखवता सेवा कार्य सुरू ठेवले. आजच्या राजकारणात अशी वृत्ती दुर्मिळ असून, त्यांच्या कार्यातून वेगळेपण स्पष्ट दिसून येते.”
--------------------------------------
गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून वाघी-नाळेश्वर सर्कल परिसरातील १६ गावांतील प्रवासी तसेच मिलरोड वसाहतीतील नागरिकांसाठी उन्हाळ्यात शीतपाणी उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता समाजसेवेचा वसा जपणाऱ्या ॲड. ठाकूर यांच्या या कार्याची परिसरात विशेष दखल घेतली जात आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकनेते कै. गोपीनाथ मुंडे, कै. गोपालसिंह ठाकूर, मातोश्री कै. वनमाला ठाकूर, कै. ॲड. श्याम जाधव, कै. बिरजू यादव, कै.लक्ष्मीबाई भुसेवाड यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक करताना ॲड. दिलीप ठाकूर यांनी या उपक्रमामागील सेवा भावना आणि सातत्याची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी मार्गदर्शन करताना अमर राजूरकर म्हणाले की, “उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस थंड पाणी देणे हीच खरी लोकसेवा आहे. अशा उपक्रमांची गरज आज अधिक आहे.” तसेच राजेश यादव यांनी ॲड. ठाकूर यांच्या विविध सामाजिक उपक्रमांचा उल्लेख करत अन्नदान, चप्पल वाटप, छत्री वितरण, ब्लँकेट सेवा व ‘कायापालट’ अभियानासारख्या कार्यांची माहिती दिली. देशभरातून मिळालेले १०९ पुरस्कार त्यांच्या कार्याची साक्ष देतात, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात नरसिंहराव कहाळेकर, राजेश केंद्रे, प्रेमराज कोकाटे, गोपाळ रापतवार यांनीही मनोगत व्यक्त करत ॲड. ठाकूर यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले. प्रमुख अतिथी म्हणून सुरेश शर्मा, स्वप्निल गुंडावार, रुपेश व्यास यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन अरुणकुमार काबरा यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेशसिंह ठाकूर यांनी मानले. या उपक्रमासाठी संतोष भारती, गजू कापसे, अमोल गवळे, उद्धव इंगोले, सचिन उत्तरवार, जावेद पठाण, बालाजी जोंधळे, शेख रहेमान, गजानन मारावार यांनी विशेष परिश्रम घेतले.