नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहानिमित्ताने महाड सत्यागृह शताब्दी आणि महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव उत्साहात पार पडत आहे. आज शनिवार दि.११ एप्रिल, २०२६ रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्ताने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर हे होते. मुख्यवक्ते तेलंगाना न्यूज टीव्हीचे कार्यकारी संचालक तथा वरिष्ठ पत्रकार पाशम यादगिरी हे होते. विशेष उपस्थितीमध्ये प्र-कुलगुरु डॉ. अशोक महाजन, हैद्राबाद
येथील कस्टमचे माजी अधीक्षक महेश्वर राज, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, डॉ. चंद्रकांत बाविस्कर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, समन्वयक डॉ. सुनीता पाटील यांची उपस्थिती होती.
दुसऱ्या सत्रामध्ये मुंबई येथील शाहीर चरण जाधव यांनी आंबेडकरी शाहिरी जलसा सादर केला.
रविवार दि.१२ एप्रिल, २०२६ रोजी विद्यापीठ परिसरातील व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये “महाड सत्यागृह शताब्दी वर्षे/समतेचा संघर्ष” या विषयावर चित्रकला स्पर्धा, “महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील समता, स्वतंत्र व संविधान” या विषयावर रांगोळी स्पर्धा तर “महाड सत्यागृह महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार” या विषयावर वकृत्त्व स्पर्धा पार पडणार आहे. तर सोमवार दि.१३ एप्रिल, २०२६ रोजी विद्यापीठातील ज्ञान स्त्रोत केंद्रामध्ये १८ तास अभ्यासाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत विद्यार्थी व कर्मचारी अभ्यास करणार आहेत.
मंगळवार, दि.१४ एप्रिल, २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून दि.१५ एप्रिल, २०२६ रोजी समारोप व पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुधीर गव्हाणे यांची उपस्थिती लाभणार आहे, असे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. सुनीता पाटील यांनी कळविले आहे.
जयंती महोत्सव व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.मारुती गायकवाड, डॉ. राजेंद्र गोणारकर, काळबा हनवते, संदीप एडके, हर्षवर्धन दवणे यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.