नांदेड : पावसाने सलग दीड महिन्यापासून दडी मारल्याने नांदेड जिल्ह्यातील खरीप हंगाम संकटाच्या छायेत आला आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून अनेक भागांत सोयाबीन, तूर, कापूस आणि हळद या प्रमुख पिकांवर करपण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून नांदेड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी भाजपा महानगराध्यक्ष तथा आ. अमरनाथ राजूरकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यातच गेल्या दीड महिन्यापासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली. मात्र, त्यानंतर दीर्घकाळ पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून पिकांना पाण्याची तीव्र गरज भासत आहे.सोयाबीन, तूर, कापूस आणि हळद यासह विविध खरीप पिकांवर या पावसाच्या खंडाचा गंभीर परिणाम झाला आहे. बहुतांश भागांत पिके सुकण्यास सुरुवात झाली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे. पावसाचा खंड आणखी वाढल्यास उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.पेरणीपूर्व मशागत, बियाणे, खते, कीटकनाशके, औषधे, मजुरी यासाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. मात्र, आता पिके हातातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने हा खर्चही भरून निघेल की नाही, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आणखी मोठे संकट उभे राहिले आहे.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पर्जन्यमान, पिकांची स्थिती आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यांचे तातडीने सर्वेक्षण करून नांदेड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा. तसेच शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार तातडीने मदत व आवश्यक सवलती उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आ.अमरनाथ राजूरकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.या शिष्टमंडळात महापौर कविता मुळे ,स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले ,सभागृह नेते महेश कनकदंडे ,माजी महापौर जयश्री पावडे ,एडवोकेट निलेश पावडे आदींचा समावेश होता.