कोल्हापूर दि.१४ उद्योग विश्वाला आणि शहराला विविध सुविधा दिल्याबद्दल नुकताच उद्योग मंत्री उदय सामंत यांचा कोल्हापुरातील उद्योजकांनी नुकताच सत्कार केला होता. परंतु आज काही उद्योजकांनी केंद्र सरकारच्या कामांवर आक्षेप घेतल्याचे वर्तमानपत्राच्या माध्यमातून कळाले.
भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी गेल्या १० वर्षात समाजातील प्रत्येक घटकाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी अथक परिश्रम घेतले. आपल्या देशातील गोर-गरीब, वंचित, शोषित, कामगार, पिडीत, शेतकरी, महिला, उद्योजक, कारखानदार अशा सर्व घटकांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आखल्या आणि कृतीत आणल्या. या माध्यमातून विकसित भारतचा नारा देत, २०४७ पर्यंतचा रोडमॅप पंत प्रधान मोदीजींनी आखला व त्यातूनच पायाभूत सुविधा, उद्योजकता विकास, परकीय गुंतवणूक अशा बाबी वेगाने विकसित होताना दिसत आहेत.
दिशाभूल करणे व दबाव आणणे अशा पद्धतीची संस्कृती असणाऱ्या कोल्हापुरातील काही काँग्रेसी नेते मंडळींकडून, लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक संघटनांना, शिक्षण संस्थांना, उद्योजकांना, कारखानदारांना वेठीस धरले जात आहे. स्वत:चे संकुचित विचार त्यांच्या तोंडून वदवून घेण्याचे काम सुरु आहे. अशा भ्याड कृत्यांचा भारतीय जनता पार्टीच्यावतीने जाहीर निषेध करीत आहोत. तसेच सबका साथ – सबका विकास हा मुलमंत्र देणाऱ्या पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या विचाराला आणि भूमिकेला कोल्हापूर जिल्ह्यातील जनता भरभरून पाठींबा देत असल्यामुळे, कॉंग्रेसच्या काही नेते मंडळींना पोटशूळ उठला आहे.
कोविड काळानंतर रस्त्यावर उभे राहून व्यवसाय करणा-या फेरीवाल्यांसाठी पी.एम.स्वनिधी योजना आणून, लाखो फेरीवाल्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम अतिशय उत्तमरीत्या पार पडले. स्टार्ट अप इंडियाच्या माध्यमातून २०१५ पासून रोजगार निर्मिती वाढली आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून, लाखो नव उद्योजकांना स्वत:च्या पायावर उभे केले.
CGTMSE सारख्या योजना आणून, अनेक लघु व मध्यम उद्योजकांना केंद्र सरकारच्या माध्यमातून आपला व्यवसाय पुन्हा वेगाने सुरळीत करण्यासाठी फार मोठी मदत करण्यात आली. पायाभूत सुविधांचा विचार करायचा झाल्यास, कोल्हापूर विमानतळाला उडान योजनेअंतर्गत ४५० कोटी पेक्षा अधिक निधी देऊन, विमान सेवा विस्तारली. कोल्हापूर – मुंबई रेल्वे मार्गाचे दुहेरी करण – विद्युतीकरण करून , लवकरच वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्स्फर (DBT) च्या माध्यमातून, केंद्र सरकार कडून ज्या योजनांचे पैसे वितरीत केले जातात, ते थेट लाभार्थ्यां पर्यंत पोचत आहेत व त्यातूनच समाजातील अनेक घटकांना त्यांच्या न्याय हक्काचे पैसे गेल्या १० वर्षात व्यवस्थित मिळत आहेत.
प्रत्येक गोष्टीत दलाली व भ्रष्टाचार करून, ज्यांनी गेल्या ७० वर्षात राजकारण केले, त्या काँग्रेसी नेत्यांना आता काहीच मिळत नसल्यामुळे मा.मोदिजींवर व केंद्र सरकारवर बेछूट आरोप करणे असा एक कलमी कार्यक्रम संपूर्ण देशात राबवला जात आहे. याचाच एक भाग म्हणून गेल्या १५ दिवसातील काँग्रेसी नेत्यांची विधाने पहिली, तर निवडणुकीत पराभव दिसू लागल्यामुळे उद्विग्न मानसिकतेतून अशा प्रकारे, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा प्रकार सुरु आहे.
या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष, विकसित भारत व सकारात्मक राजकारण हा दृष्टीकोन ठेऊन मतदारांपर्यंत पोचले आहेत. त्यामुळे या पत्रकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व औद्योगीक, व्यापारी, समाज संघटनांना, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आवाहन करण्यात येते कि, आपण दोन्ही उमेदवारांची, पक्षांची मते लक्षात घेऊन, खरी भूमिका समजून घ्यावी.