विद्यापीठ आणि मनपा यांच्या समन्वयाने शहराचा कायापालट करता येईल – कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांचे आवाहन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 01/04/2026 6:40 PM

नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वार्षिक स्नेहसंमेलन ‘ज्ञानतीर्थ २०२६’च्या उद्घाटन समारंभाचा आज दि. १ एप्रिल, २०२६ रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. या भव्य सोहळ्याने सांस्कृतिक
व शैक्षणिक कार्यक्रमांच्या पर्वाची दिमाखदार सुरुवात झाली. विद्यापीठ परिसरातील विविध संकुलांतील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर होते. प्रमुख पाहुण्या म्हणून नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर कविता संतोष मुळे, तर विशेष उपस्थितीत किनवटचे आमदार भीमरावजी केराम हे होते. तसेच
व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. बी. एस. सुरवसे यांचीही विशेष उपस्थिती लाभली. व्यासपीठावर कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रभारी प्राध्यापक डॉ. पृथ्वीराज तौर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. चासकर यांनी समाजाच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी पुढे येत नव्या कल्पना मांडाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण उपक्रमांची मागणी करण्यात आली असून विद्यार्थी सकारात्मक प्रतिसाद देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी महिला सक्षमीकरण व स्वच्छता क्षेत्रात कार्य करणाऱ्या कविताताई यांच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला. नांदेड शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ
आणि नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शहर विकासासाठी उपक्रम राबविल्यास शहराचा निश्चितच कायापालट होईल यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
किनवटचे आमदार भीमरावजी केराम यांनी किनवट भागातील आदिवासी समाजाबद्दल सामाजिक भूमिका व्यक्त केली. किनवट परीसरातील आदिवासींचे सांस्कृतिक वैभव आणि कला जोपासण्याचे काम महाराष्ट्र शासनातर्फे होत आहे. यामध्ये विद्यापीठाची भूमिका महत्वाची आहे.  
याप्रसंगी राष्ट्रीय युवक महोत्सवातील विजेत्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या यशाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रभारी प्राध्यापक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले. ‘ज्ञानतीर्थ २०२६’च्या निमित्ताने विद्यापीठ परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी दिवसांत विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.
*चौकट*:
*युवकांनी कुटुंब, समाज व देशासाठी योगदान द्यावे – महापौरांचे आवाहन*
महापौर कविता मुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना युवकांनी केवळ स्वतःपुरते मर्यादित न राहता कुटुंब, समाज आणि
देशाच्या विकासासाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग करावा, असे आवाहन महापौरांनी केले. भारतीय संस्कृतीत कुटुंब संस्था अत्यंत महत्त्वाची असून कुटुंब सशक्त केल्याशिवाय समाज आणि देश सुदृढ होऊ शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय युवक महोत्सवातील विजेत्यांचा सन्मान करताना त्यांनी त्यांच्या परिश्रमाचे कौतुक केले. यश सहज मिळत नाही, त्यासाठी कठोर मेहनत व सातत्य आवश्यक असते. नांदेड शहराच्या विकासासाठी विद्यापीठाची आणि विद्यार्थ्यांच्या संशोधनाची निश्चितच मदत घेण्यात येईल. यासाठी विद्यापीठ प्रशासनाने आम्हाला मार्गदर्शन करावे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नांदेड महानगर पालिका सदैव कटीबद्ध आहे.
युवकांनी चांगल्या सवयी अंगीकाराव्यात, पुस्तकांशी मैत्री करावी, योग्य संगत ठेवावी व प्रश्न विचारण्याची सवय जोपासावी,
असे मार्गदर्शन त्यांनी केले. तसेच विद्यापीठ व स्थानिक स्वराज्य संस्था एकत्रितपणे कार्य केल्यास सक्षम, संस्कारित व स्वच्छ समाज घडविणे शक्य असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Share

Other News

ताज्या बातम्या