नांदेड शहरात हरित पट्टा निर्मितीसाठी ४०० वृक्षांची लागवड;महापौर सौ.कविता संतोष मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपक्रम संपन्न

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 11/09/2026 7:50 PM

नांदेड : महाराष्ट्रातील वाढती उष्णता आणि पाणी टंचाईच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी 'निसर्ग आधारित उपाययोजना' अंतर्गत नांदेड शहरात एका विशेष वृक्ष लागवड मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड महानगरपालिका, अखिल भारतीय आपत्ती निवारण संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय,नांदेड आणि संस्कृती संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.११ सप्टेंबर २०२६ रोजी तरोडा भागातील कॅनॉल रोड येथे ४०० वृक्ष लागवडीचा कार्यक्रम ट्रि-गार्डसह यशस्वीपणे राबविण्यात आला.

या पर्यावरणपूरक उपक्रमाचे उद्घाटन नांदेड शहराच्या *महापौर सौ.कविता संतोष मुळे* यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रभागातील स्थानिक नगरसेवक सतीश देशमुख, सौ.सुनिता रुपक जोंधळे, संतोषभाऊ मुळे, महानगरपालिकेचे उपायुक्त गंगाधर ईरलोड, मुख्य उद्यान अधिक्षक डॉ.मिर्झा बेग, क्षेत्रिय अधिकारी नागनाथ पतंगे, रावण सोनसळे, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उष्णता आणि पाणी टंचाईवर निसर्ग आधारित तोडगा
सध्या संपूर्ण महाराष्ट्राला हवामान बदलामुळे वाढणारे तापमान आणि पाणी टंचाईच्या तीव्र समस्येचा सामना करावा लागत आहे. यावर दीर्घकालीन आणि प्रभावी उपाय म्हणून शहरांमध्ये 'हरित पट्टा' निर्माण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. याच उद्देशाने तरोडा परिसरातील कॅनॉल रोड येथे ४०० विविध वनौषधी व सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली. लावलेली झाडे सुरक्षित राहावीत, जनावरांपासून त्यांचे रक्षण व्हावे आणि त्यांचे योग्य संवर्धन व्हावे यासाठी प्रत्येक रोपट्याला 'ट्रि गार्ड' बसविण्यात आले आहेत.

कार्यक्रमात बोलताना महापौर सौ.कविता संतोष मुळे म्हणाल्या, "पर्यावरणाचा समतोल राखणे आणि शहराचे तापमान नियंत्रित ठेवणे ही काळाची गरज आहे. केवळ वृक्ष लागवड करून चालणार नाही, तर त्यांचे जतन आणि संगोपन करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असून, नागरिकांनीही आपल्या परिसरात जास्तीत जास्त झाडे लावून नांदेडला हरित व सुंदर बनवण्यासाठी सहकार्य करावे."

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय आपत्ती निवारण संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय आणि संस्कृती संवर्धन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. महानगरपालिकेच्या उद्यान विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीच्या जागेचे व पुढील देखभालीचे चोख नियोजन केले होते. उपस्थित नगरसेवकांनी प्रशासनाच्या या मोहिमेचे स्वागत करत आपापल्या प्रभागातही अशाच प्रकारे हरित पट्टे विकसित करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्याचप्रमाणे या मोहिमेमुळे तरोडा परिसरातील कॅनॉल रोड आगामी काळात एक सुंदर, थंड आणि पर्यावरणपूरक परिसर म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

Share

Other News

ताज्या बातम्या