माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथील
नंबर बांधावरून शेतरस्ता खुला करुन द्यावा,या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शेतात गुरूवार पासून बायका मुलांना घेऊन उपोषणाला सुरुवात केली होती, हा प्रश्न
सोडवण्यासाठी खुद्द तहसीलदार वैशाली पाटील ह्या बैलगाडीतून प्रवास करून उपोषणस्थळी पोहोचल्या आणि रस्त्याचा प्रश्न सोडवला. शेतकऱ्यांनी दिलेल्या
निवेदनात म्हटले होते की, जमीन गट नंबर ८३ व ८४ शिवार मौजे गंगामसला च्या बांधावरून हक्कांत रस्ता खुला करून देण्याचा आदेश तहसीलदार , व उपविभागीय अधिकारी माजलगाव तसेच दिवानी न्यायाधिश (व स्तर) माजलगाव आमच्या हक्कांत
असल्यामुळे मा.तहसिलदार यांनी दिलेल्या निकालाची अमंलबजावणी करण्याचा आदेश दिलेला आहे तरीही
प्रश्न सुटत नव्हता. या आदेशानुसार २६ जुलै रोजी सर्व अर्जदार, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलिस बंदोबस्तात हजर झाले होते, परंतु संबंधित मंडळ अधिकारी यांनी
हद्दबंदिच्या खुना नाहीत व शेतकऱ्यांनी केलेल्या खुणा आहेत त्यामुळे अडचण असून, जेथे रस्ता करायचा आहे, तेथे पाणी असल्यामुळे रस्ता देण्याची अंमलबजावणी करता येणार नाही असे अधिकाऱ्यांनी सांगून सदरील पंचनामा केला व अर्जदाराच्या
स्वतंत्र जवाबास नकार दिला होता. यामुळे आमच्यावर अन्याय होत असल्याचे व
रस्त्याअभावी शेती वहिती करणे कठीण झाले आहे व अतोनात नुकसान होत असून
आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे, तात्काळ रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा या
आशयाचे निवेदन देऊन मागणीसाठी गुरूवार पासुन आपल्या कुटुंबासह गोपीनाथ खेत्री,
दत्तात्रय खेत्री उपोषणाला बसले होते. शेतकऱ्यांचा हा प्रश्न लक्षात घेऊन तहसीलदार
वैशाली पाटील यांनी स्वतः या शेत रस्त्यावर बैलगाडीतून प्रवास करून या रस्त्याचा प्रश्न
मार्गी लावला. यासाठी मंडळ अधिकारी पदमाकर मुळाटे,व्ही.एस.टाखणखार,अ. कारकुन
एम,एन.साबने,तलाठी सुभाष गोरे, पोलिस बिट अंमलदार अतिशकुमार देशमुख,हे.कॉ.
वाघमारे, कोतवाल गणेश खेत्री, बाळु खेत्री दाखल झाले होते.रस्त्याचा प्रश्न मार्गी
लागताच उपोषण सोडले. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.