विचारांची आणि मनाची स्वातंत्रता हीच खरी लोकशाही- प्रा डॉ सुधीर गव्हाणे

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 15/04/2026 6:06 PM

नांदेड:- संकुचित विचार करणे किंवा एका विशिष्ट वर्तुळात वावरणे हे लोकशाहीचे विकृतीकरण आहे. आपले घर,  आपली माणसे,  आपला समाज एवढा पुरता संकुचित विचार हा देशासाठी आणि स्वतःसाठी घातक आहे. सर्व काही आपल्यालाच, आपल्याच घरात असणे हा स्वार्थीपणा दुबळेपणाचे लक्षण आहे. लोकशाही करिता मनाचे खुजीकरण जास्त धोकादायक आहे. म्हणून विचारांची आणि मनाची स्वातंत्रता हीच खरी लोकशाही आहे असे मत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ज्येष्ठ विचारवंत डॉ सुधीर गव्हाणे यांनी मांडले.

 ते आज बुधवार दिनांक १५ एप्रिल रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रातर्फे आयोजित महात्मा ज्योतिराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाच्या समारोप पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून आपले विचार मांडत होते. याप्रसंगी विचार मंचावर त्यांच्या समवेत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ अशोक महाजन, कुलसचिव डॉ डी डी पवार, माजी उपसंचालिका सुनीता रोडगे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ राजपाल चिखलीकर, अध्यासनाच्या समन्वयिका डॉ सुनिता पाटील, माध्यम शास्त्र संकुलाचे माजी संचालक राजेंद्र गोणारकर यांची उपस्थिती होती.

 पुढे डॉ गव्हाणे म्हणाले आपल्यातील संवाद दिवसेंदिवस हरपत चालला आहे. आपले वर्तुळ कमी-कमी होत चालली आहत. बंधू भावाचा विसर पडत आहे. "सारे भारतीय माझे बांधव" आहेत या  प्रार्थनेमधील वाक्यांचा आपल्याला विसर पडत आहे. तेव्हा जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आपल्या विचाराला मनाला आणि शरीराला स्वातंत्र्य द्या. असे आवाहन या वेळी त्यांनी केले. याबरोबरच काही महत्त्वाच्या अपेक्षाही यावेळी त्यांनी अध्यासन केंद्राकडून व्यक्त केल्या. ते म्हणाले अध्यासन केंद्रातर्फे संशोधनावर भर देण्यात यावा. विद्यार्थ्यांना रिसर्च फेलोशिप देण्यात यावी.  त्याचबरोबर शिक्षक वर्गालाही अध्यासनातर्फे योग्य संशोधन केल्यास फेलोशिप देण्यात यावी. 

अध्यक्षीय समारोपात विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ अशोक महाजन म्हणाले की १०० वर्षानंतरही डॉ  बाबासाहेब आंबेडकर आणिg महात्मा फुले यांचे विचार किती समर्पक आहेत. एकीकडे विज्ञान झपाट्याने प्रगती करीत आहे. आपण ए आय सारख्या युगात आपण वावरत आहोत. पण त्याचबरोबर या दोन महात्म्यांच्या विचारांचा पगडा आपल्या मनात रुजवणे महत्त्वाचे आहे. शेवटी त्यांनी डॉ  सुधीर गव्हाणे यांनी अध्यासकेंद्रातर्फे व्यक्त केलेल्या अपेक्षांची परिपूर्ती लवकरच कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्याशी चर्चा करून पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

 जयंती महोत्सवामध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चित्रकला, रांगोळी स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा यांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ राजेंद्र गोणारकर यांनी केले. या कार्यक्रमास रासयो संचालक डॉ मारुती गायकवाड,  ज्ञानस्तोत्र केंद्राचे संचालक डॉ  जगदीश कुलकर्णी उपकुलसचिव डॉ रवी सरोदे, जनसंपर्क अधिकारी डॉ अशोक कदम, काळबा हाणवते यांच्यासह प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Share

Other News

ताज्या बातम्या