भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा;विजेत्यांना पारितोषिक तर भाग घेणाऱ्या स्पर्धकांनाही मिळणार प्रशस्तीपत्र

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 15/04/2026 7:34 PM

नांदेड  :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने राज्यभरात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये विचारप्रवर्तक लेखनाची आवड निर्माण करणे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांसाठी आपले आयुष्य समर्पित करून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे. त्यांचे कार्य केवळ एका निबंधात मांडणे शक्य नाही. त्यामुळे आंबेडकर यांनी महिलांविषयी केलेले कार्य महिला सक्षमीकरणात त्यांनी दिलेले योगदान या विषयावर ही निबंध स्पर्धा होणार आहे.

स्पर्धेचे स्वरूप  
या स्पर्धेत पहिल्या गटात शासकीय आयटीआय, खाजगी आयटीआय तसेच आयटीआय उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. तर विषयासाठी विद्यार्थ्यांना 500 ते 800 शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

दुसरा खुला गट असून यात राज्यातील सर्व महिला आणि पुरुष सहभागी होऊ शकतात या गटाला 800 ते 1200 शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दोन्ही गटाला निबंध केवळ मराठी भाषेत सादर करावा लागणार आहे. स्पर्धेचा कालावधी 14 ते 20 एप्रिल 2026 हा निश्चित करण्यात आला आहे.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणारे स्पर्धक 9152230193 या मोबाईल क्रमांकाशी संपर्क करू शकतात. त्याचबरोबर या स्पर्धेच्या नोंदणीसाठी क्यूआरकोडही देण्यात आला आहे. नोंदणी केल्यावर स्पर्धकांना त्याची पोच ही मिळणार आहे.

या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, संविधानिक मूल्ये आणि नेतृत्वगुण विकसित करण्यावर भर दिला जात आहे. तसेच उत्कृष्ट निबंधांना पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशस्तीपत्र ही दिले जाणार असल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी दिली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या