भगूर शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा रेल्वे ओव्हरब्रिज अखेर भगूरच्या दिशेने मंजूर
*आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी!*
भगूर : भगूर शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा रेल्वे ओव्हरब्रिज अखेर भगूरच्या दिशेने मंजूर करण्यात आला असून भगूरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. प्रेरणा विशाल बलकवडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनी ही आनंदाची बातमी समोर आल्याने भगूरकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पूर्वी प्रस्तावित रेल्वे ओव्हरब्रिज लवितच्या दिशेने वळवण्यात आला होता. त्यामुळे भगूरकडे येणारा मुख्य रस्ता आणि रेल्वे गेट बंद होऊन शहराच्या व्यापार, पर्यटन आणि भविष्यातील विकासावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत नगराध्यक्षा सौ. प्रेरणा बलकवडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तत्काळ या विषयात लक्ष घालत रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला.
भगूर ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असल्यामुळे शहराचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या असलेले महत्त्व कायम राखण्यासाठी रेल्वे ओव्हरब्रिज भगूरच्या दिशेने होणे आवश्यक असल्याची ठाम भूमिका सौ. प्रेरणा बलकवडे यांनी मांडली होती. तसेच भगूरच्या व्यापारवृद्धीसाठी, नागरिकांच्या वाहतुकीसाठी आणि भविष्यातील विकासासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
भगूर नगरपरिषदेच्या सर्व सदस्यांनीही याबाबत एकमताने ठाम भूमिका घेत नगराध्यक्षांच्या पाठपुराव्यास पाठिंबा दिला. अखेर या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत रेल्वे प्रशासनाने रेल्वे ओव्हरब्रिज भगूरच्या दिशेने करण्यास मान्यता दिली असून नवीन डिझाईनचे स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे पाठवण्यात आले आहे.
हे नवीन डिझाईन भगूरच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत फायद्याचे असल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरच हा विषय भगूर नगरपरिषदेच्या जनरल बोर्ड मिटिंगमध्ये मांडण्यात येणार असून त्यानंतर आवश्यक एनओसी रेल्वे प्रशासन व महारेल ला देण्यात येणार आहे. त्यानंतर भगूरकडे येणाऱ्या ओव्हरब्रिजचे तसेच लवितकडे जाणाऱ्या पुलाचे काम गतीने पूर्ण करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे भगूर शहराच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून व्यापार, पर्यटन आणि नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीस मोठा फायदा होणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.