अहिल्यानगर, दि.२ : - देशाच्या भविष्याचा आराखडा तयार करणाऱ्या आणि शासनाच्या विकास योजनांना दिशा देणाऱ्या जनगणना २०२७ च्या घरगणना टप्प्यातील पहिले पंधरा दिवस पूर्ण झाले आहेत.या कामास गती मिळून विहित मुदतीत जनगणना कार्य पूर्ण व्हावे म्हणून प्रधान जनगणना अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी अहिल्यानगरकरांना आवाहन केले आहे.
"आपल्या दारी येणारा प्रगणक हा केवळ कर्मचारी नसून तो राष्ट्रनिर्मितीच्या महत्त्वपूर्ण कार्याचा दूत आहे. उन्हाचा तडाखा, व्यस्त दिनक्रम आणि विविध अडचणींचा सामना करत तो आपल्या घरापर्यंत पोहोचत आहे. अशा वेळी दरवाजा न उघडणे, माहिती देण्यास टाळाटाळ करणे किंवा चुकीची माहिती देणे हे केवळ जनगणना प्रक्रियेलाच नव्हे तर देशाच्या विकासालाही अडथळा निर्माण करणारे ठरते," असे आयुक्त डांगे यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, "जनगणना ही कोणत्याही व्यक्तीची किंवा कार्यालयाची मोहीम नसून ती संपूर्ण राष्ट्राची जबाबदारी आहे. आज आपण दिलेली अचूक माहिती उद्याच्या पिढ्यांसाठी शाळा, रस्ते, रुग्णालये, पाणीपुरवठा, घरे आणि विविध कल्याणकारी योजनांचे नियोजन ठरविण्यास मदत करते. त्यामुळे जनगणना म्हणजे केवळ माहिती संकलन नसून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली एक अमूल्य गुंतवणूक आहे."
जनगणना कायदा, १९४८ अंतर्गत संकलित होणारी सर्व माहिती पूर्णतः गोपनीय असून ती कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा विभागाला वैयक्तिक स्वरूपात दिली जात नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही शंका किंवा भीती न बाळगता सत्य, अचूक आणि संपूर्ण माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
घरगणनेचे उर्वरित १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे असून १४ जून २०२६ पर्यंत हे कार्य पूर्ण करावयाचे आहे. त्यामुळे प्रत्येक अहिल्यानगरकराने आपल्या दारी आलेल्या प्रगणकाचे स्वागत करावे, काही मिनिटांचा वेळ द्यावा आणि मोबाईलवर होणारी जनगणना प्रक्रिया पूर्ण करून देशाच्या या ऐतिहासिक राष्ट्रीय मोहिमेत आपला मोलाचा सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयुक्त डांगे यांनी केले आहे.
#डिजिटलजनगणना #Census2027 #अहिल्यानगर #Ahilyanagar #महानगरपालिका #AhilyanagarAMC #नागरीकर्तव्य #NationalDuty