औंरंगाबादमध्ये 10 ते 18 जुलै दरम्यान पुकारलेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यानंतर त्याच्या परिसरातील नागरिकांची ‘अँटिजन टेस्ट’ या पद्धतीद्वारे चाचणी घेण्यात येणार आहे. याशिवाय शहरात येणाऱ्यांनाही ही चाचणी करूनच प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी शहराच्या सीमेवरती चार टीम सज्ज नियुक्त करण्यात आल्या आहेत. नमुने घेतल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत 24 तासांपेक्षा अधिक कालावधी लागतो. यावर पर्याय म्हणून ‘अँटिजन टेस्ट'चा पर्याय समोर आला आहे. यासाठी 17 टास्क फोर्स सज्ज करण्यात आले आहे शहरात जिथे जिथे कोरोनाबाधित रूग्ण आढळून येईल, तेथील 500 मीटरच्या अंतरावरील नागरिकांची ‘अँटिजन टेस्ट’ करण्यात येईल. अवघ्या अर्धा ते एक तासामध्ये टेस्टचा रिपोर्ट प्राप्त होणार असल्याने बाधित रूग्णांवर वेळीच उपचार होणार आहे.
अशी होणार अँटिजन टेस्ट..
अँटिजन टेस्टमध्ये रुग्णांच्या नाकातून नमुने घेतले जातात. एका छोट्या मशीन द्वारे त्याची तपासणी शक्य आहे. ज्या किटवर तपासणी होते. त्यावर दोन लाल रेषा दिसून आल्यास रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं जातं. किटवर एकच लाल रेषा आली असेल तर रुग्ण निगेटिव्ह असल्याचं सांगितलं जातं. ‘अँटिजन टेस्ट’मुळे नागरिकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन होण्याची गरज पडणार नाही. घरच्या घरी राहूनच त्यांना चाचणी करता येणार आहे.