प्रभाग क्रमांक १५, शामराव नगर रोड, म्हसोबा मंदिराजवळ धोकादायक अवस्थेत उघडी गटार आहे. गटारावरील झाकण निकृष्ट दर्जाचे बसविल्यामुळे ते तुटून गेले असून आज हा परिसर अपघाताला निमंत्रण देत उभा आहे.
या रस्त्यावरून दररोज शेकडो नागरिक, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहने ये-जा करतात. तरीही सांगली महानगरपालिकेचे प्रशासन आणि बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. ही केवळ निष्काळजीपणा नाही, तर नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे.
मुंबईत अशाच प्रकारच्या दुर्घटना घडूनही प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. सांगलीतही अशीच दुर्दैवी घटना घडण्याची वाट पाहिली जात आहे का?
आमचा स्पष्ट सवाल आहे — एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार आहे का?
संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ या धोकादायक गटारीवर मजबूत आणि दर्जेदार झाकण बसवून नागरिकांचा जीव सुरक्षित करावा. अन्यथा भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेची संपूर्ण नैतिक व प्रशासकीय जबाबदारी सांगली महानगरपालिका आणि बांधकाम विभागावर राहील.
- मनोज भिसे
अध्यक्ष लोकहित मंच सांगली