नांदेड :- रब्बी हंगामादरम्यान फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, त्यांना राज्य सरकारने मदत द्यावी अशी मागणी भाजपा आमदार श्रीजया चव्हाण यांनी आज विधानसभेत केली.
प्रश्नोतराच्या तासात पुरवणी प्रश्न मांडताना भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी शेतकऱ्यांशी निगडीत दोन महत्वपूर्ण विषयांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. रब्बी हंगामातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यांना इतर जिल्ह्यांप्रमाणे मदत मिळणार आहे का? त्याचप्रमाणे गतवर्षीच्या खरीब हंगामातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने ३२ हजार कोटी रुपयांचे विशेष मदत पॅकेज जाहीर केले. केवायसी व इतर कारणांमुळे काही शेतकऱ्यांना अद्याप ही मदत मिळू शकलेली नाही. त्यांना ही मदत लवकर मिळावी, यासाठी राज्य सरकारने कोणती उपाययोजना केली? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
आ. श्रीजया चव्हाण यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अहवाल मागवले असून, ते उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असे आश्वासन सभागृहात दिले. तसेच गेल्या खरिपातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी घोषित झालेल्या ३२ हजार कोटी रुपयांच्या मदत पॅकेजअंतर्गत नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत सुमारे ७ लाख शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात १०९१ कोटी रुपये जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली.