नांदेड :- माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण आणि भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्रीजया चव्हाण यांनी आज जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन नांदेड जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांना गती देण्याबाबत व निधी उपलब्धतेबाबत विचारविनिमय केला.
मंत्रालयातील विखे पाटील यांच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत खा. अशोकराव चव्हाण आणि आ. श्रीजया चव्हाण यांनी रेणापूर सुधा प्रकल्पाची उंची १.१० मीटरने वाढविण्याच्या कामासंदर्भात चर्चा केली. या प्रकल्पाच्या कामासाठी तसेच शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मावेजा देण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
पिंपळढव साठवण तलावाबाबत संवाद साधताना या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम करण्यासाठी, भूसंपादन व वन जमीन वळती करण्यासाठी तसेच बुडीत क्षेत्रातील उंच पुलाचे काम, डौरवाडी ते धरणस्थळ व पिंपळढव ते धरणस्थळचा पोहोच रस्ता आणि इतर अनुषांगिक कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करण्यात आली.
नांदेड जिल्ह्यातील उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर धरणाची तूट भरून काढण्यासाठीची खरबी वळण योजना, पेनगंगा नदीवरील ७ उच्च पातळी बंधारे कालवे आणि पेनगंगा प्रकल्पाच्या कालव्याच्या अस्तरीकरणाची कामे करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी खा. अशोकराव चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी याप्रसंगी मांडली.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र सुधारणा कार्यक्रम अंतर्गत डॉ. शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प व उर्ध्व पेनगंगा प्रकल्प तसेच सुधा बृहद लघु पाटबंधारे प्रकल्पाला निधी मिळणे, अर्धापूर नगरपंचायतीच्या हद्दीतील जलसंपदा विभागाच्या मालकीच्या जागेवर नमो उद्यान विकसित करणे, मुदखेड येथील जलसंपदा विभागाची जमीन न्यायालय तसेच न्यायाधीशांचे निवासस्थान आणि ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रासाठी हस्तांतरीत करणे आदी विषयांवरही या बैठकीत चर्चा झाली.