आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती समृद्ध करा - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 14/05/2026 9:40 PM

नांदेड :- बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेती अधिक शाश्वत आणि उत्पादनक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक कृषी अवजारांचा वापर करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेती समृद्ध करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 

आज मौजे लालवंडी (ता.नायगाव) येथे संस्कृती संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी आणि हवामान अनुकूल शाश्वत विकास प्रकल्प (BCRC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख, उपविभागीय कृषि अधिकारी वी बी गित्ते, तालुका कृषि अधिकारी नायगाव दिपेश देवरे व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

*आधुनिक यंत्रांचे सादरीकरण*

यावेळी शेतातील पीक अवशेष व्यवस्थापनासाठी 'ट्रॅक्टरचलित श्रेडर' आणि जमिनीतील कठीण थर फोडून पाणी मुरवण्याची क्षमता वाढवण्यासाठी 'सबसॉइलर' (Sub-soiler) या यंत्रांचे प्रत्यक्ष कार्य करून दाखवण्यात आले. जिल्हाधिकारी कर्डिले यांनी तंत्रज्ञानाची पाहणी करून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा वापर करावा, असे आवाहन केले.

*खरीप पूर्व मोहिमेचा आढावा*
प्रात्यक्षिकानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या 'खरीप हंगाम पूर्व गाव मोहिमे'ला भेट दिली. यावेळी त्यांनी खालील बाबींवर विशेष भर दिला:
 
बियाणे उगवण क्षमता: पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी घरच्या घरी बियाण्यांची उगवण क्षमता तपासावी.
बीजप्रक्रिया: पिकांच्या संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
घरचे सोयाबीन बियाणे: बियाण्यांवरील खर्च कमी करण्यासाठी घरचेच सोयाबीन बियाणे वापरण्याबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

*महिला बचत गटांसाठी 'अवजारे बँक'*
या कार्यक्रमात कृषी विभागाच्यावतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (PoCRA) ग्राम स्तरावर महिला बचत गटांसाठी सुरु करण्यात आलेल्या 'कृषी अवजारे बँक' योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. महिलांनी कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून पुढे यावे, यासाठी ही योजना मैलाचा दगड ठरेल, असे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमास लालवंडी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तांत्रिक मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.

Share

Other News

ताज्या बातम्या