नांदेड : बंजारा व लमाण तांड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 24 तांड्यांना यापूर्वीच महसूली गावांचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. आणखी 125 बंजारा/लमाण तांड्यांना महसूली गावांचा दर्जा देण्याची कार्यवाही सध्या जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांच्या पुढाकारातून प्रगतीपथावर आहे.
या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आज प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे या योजनेकडे विशेष लक्ष असून त्यांच्या पुढाकारातून आतापर्यंत 24 तांड्यांना महसूली गावाचा दर्जा मिळाला आहे. संबंधित तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना सातत्याने कार्यप्रवण करून या प्रक्रियेला गती देण्यात येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार आयोजित कार्यशाळेत तांड्यांचे प्रस्ताव सादर करण्यापासून ते स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यापर्यंत करावयाच्या विविध कामांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले. येत्या आठ दिवसांत 125 तांड्यांचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, तहसीलदार विपीन पाटील, आनंद रहाटीकर, समन्वय अधिकारी उषा कदम तसेच विविध तालुक्यांतील नायब तहसीलदार, सहायक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि ग्राम विकास अधिकारी असे 300 पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
तांड्यांचे महसूली गावात रूपांतराचे फायदे :
▪ मूलभूत सुविधा : रस्ते, अंतर्गत रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधांची उपलब्धता सुलभ होणार.
▪ स्वतंत्र ग्रामपंचायत : लोकसंख्येचा निकष पूर्ण करणाऱ्या तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळणार असून विकास प्रक्रियेत स्थानिक सहभाग वाढणार.
▪ निधीची उपलब्धता : महसूली गावाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर विविध योजनांतर्गत निधीची मुबलक तरतूद होणार असून तांड्यांची समृद्धीकडे वाटचाल वेगाने होईल.