नांदेड : वैद्यकीय सेवा ही केवळ व्यवसाय न मानता सामाजिक बांधिलकीचे सेवा माध्यम म्हणून आयुष्यभर कार्यरत राहिलेले ज्येष्ठ समाजसेवक, वैद्यकीय विशेषज्ञ आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांचे अभ्यासक डॉ. हंसराज दादारावजी वैद्य यांच्या बहुआयामी सेवा कार्याचा केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण कार्यालय, नांदेड तथा सप्तरंग सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य विशेष सोहळ्यात ‘जीवन गौरव अर्थात लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. शाल, श्रीफळ व पुरस्कार देऊन डॉ. वैद्य यांचा सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यास नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, खासदार डॉ. अजित गोपछडे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, नांदेड महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, समाज कल्याण तथा सामाजिक न्याय विभागाचे सहआयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघांचे भाजप अध्यक्ष, संजय कोडगे, चैतन्यबापू देशमुख तसेच सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा डॉ.सान्वी जेठवाणी, त्यांच्या गुरुमाँ तथा ज्येष्ठ सहकारी भगिनी, उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभागाचे कार्यकारणी सदस्य आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
‘जेथे कमी, तेथे आम्ही’ या सेवाभावी ब्रीदवाक्याचा उल्लेख करत निवेदकांनी डॉ. वैद्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समाजातील गरजू घटकांसाठी केलेल्या अखंड कार्याचा गौरव केला. पुरस्कार स्वीकारताना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या सेवाभावी वाटचालीला दाद दिली.
डॉ. वैद्य यांनी १९७९ पासून वजिराबाद, नांदेड येथे वैद्यकीय सेवा देत असंख्य रुग्णांना आधार दिला आहे. त्यापूर्वी शासकीय वैद्यकीय अधिकारी म्हणून औरंगाबाद आणि नांदेड येथे तब्बल ११ वर्षे त्यांनी सेवा बजावली. वैद्यकीय सेवेसोबतच महिला, बालके, दिव्यांग, अंध, वृद्ध, बेघर, पूरग्रस्त, तसेच विविध आपत्तीग्रस्त विस्थापित घटकांसाठी त्यांनी सातत्याने मदतकार्य केले.
पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला व बाल सहाय्य कक्षाच्या समितीवर गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सदस्य म्हणून कार्यरत राहून त्यांनी हजारो महिलांना आधार दिला. नेरली येथील कुष्ठधाम संस्थेच्या माध्यमातून कुष्ठरोगी व मतिमंद व्यक्तींसाठी वैद्यकीय उपचार, पुनर्वसन आणि सेवाकार्यातही त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी डॉ. वैद्य यांची गेल्या १५ वर्षांपासूनची वाटचाल विशेष उल्लेखनीय आहे. राज्य संघटनेशी संलग्न राहून त्यांनी ग्रामीण भागातील विस्थापित गरीब, गरजवंत, दुर्लक्षित उपेक्षित, आदिवासी, वंचित शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, विधवा, परित्यक्ता तथा दिव्यांग ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला. सध्या ते ज्येष्ठ नागरिक संघाच्या उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्काम नांदेडचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रात ३५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी योगदान दिले आहे. त्याचबरोबर वृक्षलागवड, शेतकरी मार्गदर्शन, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, सामाजिक जनजागृती आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन असे विविध उपक्रम त्यांनी राबविले.
त्यांच्या कार्याची दखल घेत फेस्काम 'उत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक सेवा पुरस्कार', पोलीस दलाचा ‘पोलीस मित्र’ सन्मान, दिव्यांग मित्र पुरस्कार तसेच कोरोना काळातील सेवेसाठी राज्यस्तरीय गौरव अशा विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला आहे. साहित्य क्षेत्रातही त्यांनी कविता व लेखनाच्या माध्यमातून योगदान दिले आहे.
डॉ. हंसराज वैद्य यांचा जीवनप्रवास म्हणजे वैद्यकीय सेवेतून समाजसेवेकडे आणि समाजसेवेतून मानवतेच्या व्यापक व्रताकडे झालेली अखंड वाटचाल आहे. त्यांच्या या बहुआयामी कार्याचा जीवनगौरव करून सप्तरंग सेवाभावी संस्थेने एका सेवाव्रती व्यक्तिमत्त्वाच्या कार्याला समाजासमोर आदराने अधोरेखित केले आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर पालकमंत्र्यांना निवेदन
दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात डॉ. हंसराज वैद्य, प्रभाकर कुंटूरकर, गिरीश बाराळे, डॉ लक्ष्मी पुरणशेट्टीवार, दलित मित्र ज्येष्ठ पत्रकार माधवरावजी पवार काटकळंबेकर आदींनी पालकमंत्री अतुल सावे यांना निवेदन देऊन त्यांच्या समस्या शासनस्तरावर सोडविण्याची मागणी केली.