अर्धापूर : श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित श्री शारदा भवन हायस्कूल, अर्धापूर येथे सद्भावना दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. अरुण कल्याणकर होते.
यावेळी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रकाश कदम यांनी शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा, परस्पर बंधुभाव, शांतता व सौहार्दाची भावना जोपासण्याची सद्भावना दिवसाची शपथ दिली.
प्रास्ताविकात गुलाबराव मदने यांनी सद्भावना दिवसाचे महत्त्व स्पष्ट करताना जात, धर्म, भाषा व प्रांताच्या विविधतेपलीकडे जाऊन समाजात प्रेम, बंधुभाव व एकोपा निर्माण करण्याचा संदेश या दिवसातून मिळतो, असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक अरुण कल्याणकर यांनी ‘विविधतेत एकता’ ही भारतीय लोकशाहीची खरी ताकद असून, प्रत्येकाने परस्परांचा सन्मान राखत शांतता, एकता व सौहार्दपूर्ण वातावरण निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माराम कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. आर. एम. खडकीकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनिल सवडतकर, आर. एस. खांडरे, एस. एस. डोईबळे, नागेश बोचकरी, बी. एम. मोकमपल्ले, ए. ए. राऊतवाड, आर. बी. लोकरे, एस. पी. भालेराव, पी. एस. तेलंग, डी. बी. पंडीत, व्ही. डी. काळे, एन. पी. केरूरकर, पी. डब्ल्यू. लोखंडे व व्ही. के. कवाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.