कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना लाभ देण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणुक करा :-जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/09/2021 8:30 AM


       
        कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना शासनाचे सर्व लाभ मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करा. त्यासाठी प्रत्येक तीन ते चार कुटुंबांच्या पाठीमागे एका नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करून आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची तातडीने पूर्तता करून घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालक व त्यांच्या नातेवाईकांशी आज जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रत्यक्ष संवाद साधला. तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व शासन आपल्या पाठीशी ठामपणे राहील अशा विश्वासही त्यांनी यावेळी दिला. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुर्वणा पवार, महिला व बाल समितीच्या अध्यक्षा सुचिता मलवाडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोरोना संकटामुळे अनाथ झालेली बालके यांचे पालकत्व स्वीकारण्याची कार्यवाही महिला व बाल विकास विभागाने तातडीने पूर्ण करावी. त्याचबरोबर बालकांचे सर्व अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी गतीने काम करावे. कोरोना काळात पालक गमावलेल्या बालकांना मदत करण्यासाठी बाल संरक्षण अधिकारी बाबासाहेब नागरगोजे मो.क्र. 9552310393 व बापूसो खोत मो.क्र. 8275377322 यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याशी अधिक माहिती व मदतीसाठी अनाथ बालकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधावा, असे सांगून ते पुढे म्हणाले, अनाथ बालकांच्या शिक्षणाची तसेच त्यांची फी या अडचणी प्राधान्याने सोडविण्यावर भर द्यावा. या बालकांना शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत तातडीने मिळावी यासाठी त्यांच्याशी संबंधित विभागांनी संपर्क साधून पुढील सर्व कार्यवाहीची पुर्तता करून घ्यावी, असे आदेश देवून ज्या अनाथ बालकांचे त्यांच्या नातेवाईकांनी पालकत्व स्वीकारले आहे, त्यांनी आपलीच आपत्ये समजून त्यांची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Share

Other News

ताज्या बातम्या