नांदेड : महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाद्वारे सोमावार दि.१८.०५.१०२६ रेाजी जुन्या नांदेड भागातील मुख्य बाजारपेठांमध्ये अत्यंत तीव्र आणि धडक मोहीम राबविण्यात आली. इतवारा परिसरातील अंतर्गत चिकन मार्केट, मच्छी मार्केट, भाजी मार्केट आणि ऐतिहासिक बर्की चौक परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे या कारवाई दरम्यान हटवण्यात आली आहेत.
जुन्या नांदेडमधील इतवारा आणि बर्की चौक हा परिसर शहरातील अत्यंत गजबजलेला आणि मुख्य व्यापारी भाग आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागातील चिकन, मच्छी आणि भाजी मार्केट परिसरामध्ये रस्त्यावरच दुकाने थाटली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. तसेच बर्की चौकात अनधिकृत हातगाड्या आणि शेड उभारल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत होती. याचा पादचाऱ्यांना आणि वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.
सततची होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या तक्रारींमुळे हे पाऊल उचलत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने धडक मोहीम राबवत चोख पोलीस बंदोबस्तात या भागात थेट कारवाईला सुरुवात केली. चिकन व मच्छी मार्केट मधील रस्त्यावरील अनधिकृत ओटे, शेड आणि जाळ्या जप्त करण्यात आल्या. भाजी मार्केट मधील रस्त्याची जागा अडवून बसणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांचे साहित्य हटवण्यात आले. तसेच बर्की चौकातील वाहतुकीला अडथळा ठरणारे अनधिकृत हातगाडे, फ्लेक्स आणि तात्पुरती अतिक्रमणे जेसीबीच्या साहाय्याने पूर्णपणे काढुन टाकुन साहित्य जप्त करण्यात आले.
सदरील कारवाई *पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु* यांच्या नेतृत्वात अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पार पाडली. या कारवाईत इतवारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती, पोलीस उपनिरीक्षक आवटे व शहर वाहतुक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कांबळे, व त्यांच्या पथकाच्या सहकार्याने अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, अतिक्रमण पथक प्रमुख विशाल सोनकांबळे यांच्यासह महापालिकेचे ३० कर्मचारी तसेच पोलीस विभागातील २० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
या धडक कारवाई दरम्यान रस्त्यावर अनधिकृतपणे ठेवलेले मोठे साहित्य मनपाच्या पथकाने जप्त केले आहे. मनपा प्रशासनाने सर्व संबंधित विक्रेत्यांना आणि दुकानदारांना कडक इशारा दिला आहे की, शासकीय जागेवर किंवा रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण केल्यास साहित्य जप्त करून थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. सदर कारवाईमुळे गेल्या अनेक दिवसांपासून कोंडीत अडकलेल्या इतवारा आणि बर्की चौक परिसराने मोकळा श्वास घेतला असून, नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. ही मोहीम यापुढेही शहरातील इतर भागात अशीच तीव्र गतीने सुरू राहणार असल्याचे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.