◆ अर्धवट दुभाजक कामामुळे अपघाताची मालिका..
शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक बसविण्याचे अत्यंत संथ गतीने होत आहे. अर्धवट झालेल्या दुभाजकामुळे अपघात घडत आहेत. मात्र, याची कसलीही सोयर सुतक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाबरोबरच लोकप्रतिनिधींना नसल्याचे दिसते. त्यामुळे पुन्हा मिरज सुधार समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी मध्यभागी दुभाजक आणि पथदिवे बसविण्याची मागणी मिरज सुधार समितीने लावून धरली होती. पथदिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, अजूनही अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत. तर, जानेवारीपासून रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक बसविण्याचे काम होत आहे. मात्र, गेल्या पाच महिन्यांत बालाजी मंगल कार्यालय ते मिरज शासकीय रुग्णालयापर्यंत एका बाजूचे दुभाजक बसविण्यात आले आहेत.
दुभाजकाचे काम अत्यंत संथगतीने होत असल्याने या रस्त्यावर दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीबाबत शहरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. येत्या दोन महिन्यांत दुभाजकाचे काम पूर्ण न केल्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना दिसताक्षणी काळे फासण्याचा इशारा मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी यांनी दिला आहे. यावेळी अध्यक्ष राकेश तामगावे, नरेश सातपुते, रामलिंग गुगरी, संतोष जेडगे, असिफ निपाणीकर, अभिजित दाणेकर, वसीम सय्यद, तौफिक देवगिरी आदी उपस्थित होते.