सांगली प्रतिनिधी
अनेक भारतीय धर्मांमध्ये हत्तीला शुभ मानले जात असल्याने अनेक मंदिरांमध्ये तसेच जैन समाजाच्या मठांमध्येही हत्ती पाळण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून आहे. या परंपरेनुसारच कोल्हापूर जिल्ह्यामधील नांदणी गावात असणाऱ्या जैन मठामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हत्ती पाळण्याची परंपरा आहे. परंतु या मठामध्ये महादेवी चा छळ होत असल्याचे तसेच ती आजारी असल्याचे कारण दाखवत गुजरात मधील वनतारामध्ये पेटा संघटनेने तिची काही दिवसांपूर्वी रवानगी केली. परंतु अशा तऱ्हेने या हत्तीनीला वनतारामध्ये पाठवणे समस्त जैन बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. शिवाय या हत्तीनीला घेऊन जाताना हजारो जैन बांधवांनी याला विरोध केला. लोकांना अश्रू अनावर झाले. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडिया वरून पाहायला मिळत आहेत.
त्यामुळे समस्त जैन बांधव आणि नांदणी मधील ग्रामस्थांची अशी मागणी आहे की, महादेवीला पुन्हा नांदणी मठामध्ये पाठवून द्यावे. तिची आम्ही पोटच्या मुलाप्रमाणे सेवा करू. याबाबत महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये शहरांमध्ये आंदोलने करण्यात येऊन नागरिकांच्या सह्यांच्या मोहिमाही पार पडल्या आहेत.
लोकहित मंचच्या वतीने आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवून सदर हत्तीनीला परत नांदणीला पाठवण्यासंदर्भात विनंती करण्यात आली आहे.
या लोकांच्या विनंतीला मान देऊन आपण सदर हत्तीन पुन्हा नांदणी मठाकडे पाठवून देण्यासंबंधात कार्यवाही करावी. अशी विनंती लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी राष्ट्रपतींना केली आहे.
सदर निवेदन आज लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे,उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, निर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर, किरण बेळंकी यांनी राष्ट्रपतींना पाठवून दिले