सांगली प्रतिनिधी
सांगलीमध्ये कोल्हापूर रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य वाढले असून हे खड्डे नागरिक आणि प्रवाशांसाठी जीवघेणे ठरत आहेत. याबाबत अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क करून विनंती करूनही याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साठून राहत आहे. त्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने अनेक अपघात झाल्याच्या घटना समोर आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे ताबडतोब गांभीर्यपूर्ण लक्ष घालून सदर खड्ड्यांबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा येत्या चार दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात कोल्हापूर रोडवर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे.
लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी नुकतीच या रोडची समक्ष पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभाग एखाद्याचा बळी गेल्यावर जागा होणार का? असा सवाल ही लोकहित मंचने उपस्थित केला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त मलई कडे लक्ष न देता लोकांच्या समस्ये कडेही डोळे उघडून बघण्याची आवश्यकता आहे. ज्या कामासाठी पगार घेतला जातो निदान ते काम तरी प्रामाणिकपणे केले जावे अन्यथा या विभागातील अधिकाऱ्यांना या खड्ड्यामधील पाण्याने आंघोळ घालण्याचा इशारा लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांनी पुढे बोलताना दिला आहे.